Thursday, July 3, 2014

पाऊस आठवणीतला…




      एकदाच ढगाला पाझर फुटलं… बाल्कनीतून चिल्ल्या-पिल्ल्यांना पावसात भिजताना पाहून लहानपण आठवलं… पूर्वी शाळेला सुट्टी लागली की आमची वारी गावी असायची पार पाऊस सुरु होई पर्यंत गावात राहायचो…धिंगाणा घालयचो… मुंबई पासून अवघ्या साडे तीन तासांवर असणाऱ्या आमच्या गावाने सुदैवाने 'गावपण ' जपलय…. 
    
      मोठी कौलारू घरं… शेणाने सारवलेल्या जमिनी, घरापुढे अंगण, तेही शेणाने सारवून रांगोळीची नक्षी ल्यालेलं… खूप झाडं… शेतातून जाणारी पायवाट… गावाचं राखीव धरण… आणि ज्यामुळे गावाला 'उन्हेरे' अस नाव पडलं,ते गरम पाण्याचे झरे - कुंड….

                                               

      अशा निसर्गरम्य गावातला 'पहिला पाऊस' ही तितकाच निसर्गरम्य… बरेचदा अनुभवलाय तो पण… सोसाट्याचा वारा… वीज कडाडण… ढगांच गडगडण… गावची वीज जाणं आणि आंब्याच्या झाडांवर तग धरून राहिलेले पुरते पिकलेले  आंबे  वाऱ्याने धपाधप पडण… अगदी असाच असायचा पहिला पाऊस… दरवेळी!!




  
                                                                                        
        



      वारा सुटू लागल्यावर आम्ही लहान मुलं ते परसात पडलेले आंबे वेचण्याच्या निमित्ताने मनसोक्त भिजत असू… अनवाणी पायाने चिखल तुडवत  जास्तीत जास्त आंबे गोळा  करण्याची शर्यत लागायची विनाकारण…  

      आणि अशाच पहिल्या पावसाच्या वेळी दोनदा गारपीट पण अनुभवली… तेव्हाची गारपीट तशी शहाणी होती… ऋतू नुसारच व्हायची… अवकाळी बरसण तिच्या गावी नव्हत म्हणूनच ती सुखदही होती… 

      उन्हाळ्यात गंमत म्हणून आजी - काकू सोबत मेहनतीने  सारवलेल अंगण पावसाच्या सरींनी उखणायच आणि चिखल बनून जायचं तेव्हा कुठेतरी पावसाचा किंचित राग यायचा… अंगण सारावण्याच्या मेहनतीवर खऱ्या अर्थाने 'पाणी फिरवल' म्हणून!



                          


      आज त्या लहानग्यांना खड्डे पडलेल्या डांबरी रस्त्यांवर भिजताना पाहून खूप ठळकपणे आठवलं आणि जाणवलं ते स्वतःच निसर्गाच्या खूप जवळ असलेल बालपण! शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या आणि स्वतःच  गाव असलेल्या प्रत्येकाने हा असा पहिला पाऊस नक्कीच अनुभवला असेल… आठवणींच्या कोपऱ्यात जपला असेल… 

  आजोबांसोबत शेतात इवल्या हातांनी राबून त्यांना इवलीशी मदत करणाऱ्या स्वतःला आठवल कि पावसाची माया ध्यानात येते… निसर्गाचा, पहिल्या पावसाचा असा निर्भेळ आनंद किंबहुना 'सुख' अनुभवण्यासाठीच एका निसर्गरम्य गावातल्या शेतकरी कुटुंबात जन्माला घातलं असाव त्याने… वरुणराजाने….



                          























Friday, March 14, 2014

'R.I.P. Buddhi..... '

                                                                              
    आज खूप दिवसांनी लिहायला बसलेय....काय लिहू ? उमजत नाही....कारण ही तसच आहे म्हणा...हाताला लिहिण्याची आणि मेंदूला विचार करण्याची गेल्या काही दिवसांत सवयच नाही राहिली...म्हणजे Submissions  पुरता लिखाण होतं, तेवढचं...
    काल पासून तशी सवड आहे...म्हणूनच कदाचित आळशीपणाच्या ओझाने गुदमरत जाणारी माझी बुद्धी मला अगतिकतेने मारत असलेल्या हाका....तिच्या आणाभाका मला ऐकू येत आहेत...खूप सारा राग,चिडचिड आवरत...हतबलतेने ती मला सांगू पहातेय.... "अग ए...आवर घाल स्वत:ला,पुर्वीच्या फॉर्मात ये...'R.I.P. बुद्धी म्हणायची वेळ येण्या आधीच मला  विचार आणि कृतीचं ACTIVE ऑक्सिजन दे...
   खरच आहे म्हणा तिचं...म्हणजे busy... busy म्हणजे किती busy असतो आपण...स्वत:च्या सोईनुसार ठरत असत सगळं....जी गोष्ट आपल्याला स्वत:ला मनापासून करायची असते त्यासाठी वेळ...पैसा..श्रम...या तिन्ही गोष्टी सहज manage होतात...किंवा आपण त्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करतो...पण जर ती गोष्ट आपल्याला मनापासून करायची असेल तर आणि तरच...नाहीतर काय हजारो कारण सापडतात....अगदी लहान मुलालाही कळेल की हे निव्वळ कारण आहे...अशी अनेक कारण आपण राजरोसपणे स्वत:ला आणि दुनियेला देत असतो...
   कदाचित विषय भरकटतोय, पण हल्ली मी एखादी गोष्ट न करण्याची एवढी बाळबोध कारण ऐकतेय ना की, चुकूनही अशी कारण सुचणा-या आणि शिताफीने ती इतरांच्या माथी मारणा-या लोकांच्या यादीत मीही जाऊन बसते की काय ? अशी भिती वाटू लागली मला....म्हणूनच कदाचित ऐकू आला असेल माझ्याच बुद्धीचा आवाज मला...तीव्रतेने...आणि तितकीच तीव्र जाणिवही झाली हे महत्वाचं  !!!!
   हुश्श...आत्ता कुठे शांत झाली ही बया....माझी बुद्धी...Finally, आळस झटकलेली मी, पुन्हा तिला I.C.U.ची यात्रा नाही घडवणार...या आशेत, सुखावलेय बिच्चारी...अर्थात माझे प्रयत्नही तेच असतील...या आशेत मी पण जरा सुखावतेय आत्ता !!!!!